दादा..! भाग -५३

*दादा..!*

*भाग - ५३*

  पंचमीच्या आदल्या रात्री स्वयंपाक झाला की, काकूनं तव्यात मेहंदी भिजायला घातली, झोपायच्या आधी आमच्या दोन्ही हातांना ती लावली...

तिचं मेहंदी काढणं अगदी साधं, सोपं असायचं !
तळहातावर मध्यभागी एक मोठा गोल ठिपका द्यायची, त्याच्या बाजूनं छोट्या छोट्या ठिपक्यांची नक्षी काढायची, बोटांची दोन दोन कांडी कोरीच ठेवायची. तिसरं, म्हणजे शेवटचं कांडं मात्र नखासहीत मेहंदीनं लिडबीड करायची.

*हातावरील त्या मेहंदीच्या सुगंधाची दरवळ मात्र अनेक दिवस असायची !*

  नागपंचमीचा दिवस आनंदात गेला, घरात गोड धोड खायला केलं होतं. पण, संध्याकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान एक घटना घडली...

  आमच्या शेतात जायच्या रस्त्याला अविनाश मस्केचं घर आहे. त्याच्या घराच्या कोपऱ्यावर गावातल्या सार्वजनिक विजेचा लोखंडी पोल आहे. तिथून थोडं पुढं हापसा..

एकाच गल्लीत राहात असल्यानं अविनाशचं आणि आमचं चांगलं जमायचं. लहानपणी त्याला पोलिओ झाला होता, त्यामुळं त्याचा डावा पाय गुडघ्याच्या खाली वाळून गेला, तर उजवा पाय पंजात वाकडा झाला. तेव्हापासून तो काठीच्या आधारानं थोडंफार चालायचा, इतर वेळी दारातल्या बाजेवर कायम बसलेला असायचा...

  'त्या' हापश्याला चांगलं पाणी होतं. बैलं, म्हशी शेतात घेवून जाताना, संध्याकाळी परत गोठ्याकडं आणताना दादा, आबा त्या हापश्यावरच त्यांना पाणी पाजत. घरी असलो की, टोपलं किंवा बादली घेऊन जाणं, पाणी हापसणं आमच्याकडंच असायचं...

  त्या दिवशी आबा शेतातून जनावरं घेवून आले, त्यांना पाणी पाजण्यासाठी दादा बादली घेऊन जात होते.. अविनाशच्या घराजवळ असलेल्या पोलचा ताण(ओढा) दुसऱ्या बाजूला लावलेला होता, अनवधानानं दादांचा हात त्या जाड तारेच्या ताणाला लागला. पावसाची थोडीशी चिकचिक असल्यानं, त्यात विजेचा करंट उतरलेला होता. दादा त्याला चिटकले...

बाजेवर बसलेला अविनाश हे सारं बघत होता, पण त्याला उठता येईना...
काय करावं ते कळेना.. तशाही परिस्थितीत त्यानं त्याच्या बायकोला, "सुशे.. सुशे.. पळ.." म्हणून हाका मारल्या...
सुशिला वहिनी धावत आल्या..
झालेला प्रकार त्यांच्या लगेच लक्षात आला, त्यांनी अविनाशच्या काठीनं दादांना सोडवलं..
पण तोपर्यंत दादांचा उजवा हात काळा निळा पडला होता !

*"काळ आला होता, पण वेळ आली नव्हती !"*
असंच काहीसं झालं.  सगळ्यांनी पळापळ केली. दादांना नांदूरला नेलं, उपचार केले.. पण जास्त फायदा झाला नाही !

*दादांचा उजवा हात कायमचा अधू झाला !* त्यांना तो हात वरपर्यंत उचलता येत नव्हता, ओझं उचलता येत नव्हतं.. तरीही त्यांनी शेवटपर्यंत शेती केली.. सगळी कामं केली !*

*दादा खूप सहनशील होते !*

अविनाशचं जगणं तर खूप खडतर होतं...

*क्रमशः..*

               *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*


  

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य