दादा..! भाग- २२

*दादा..!*

*भाग - २२*

*'ऊसतोड मजुरांचा जिल्हा' म्हणून महाराष्ट्रात बीड जिल्ह्याची ओळख आहे. हे खरं असलं तरी आमचं राजेगाव निश्चित थोडं वेगळं आहे.* एखाद दुसरं कुटुंब वगळता गावातलं कुणी ऊसतोडीला बाहेर जात नाही. गाव अगदी छोटंसं, बाराशेच्या आसपास लोकसंख्या आहे, पण गावाला निसर्गाची बऱ्यापैकी साथ आहे. *सौताड्याजवळ बालाघाटच्या डोंगररांगांत उगम पावलेली मांजरा नदी गावाच्या अगदी जवळून वाहते.* त्यामुळं नदीकाठच्या शेतीला पाण्याची कमतरता भासत नाही, कधी कधी पाऊस जास्त झाला की नदीचं पाणी पात्राबाहेर येतं, गावाला खेटतं तेव्हा मात्र उभ्या पिकांत पाणीच पाणी होतं. नदीकाठच्या जमिनी मोठ्या सुपीक आहेत. जमिनीखाली ३०-३५ फुटांपर्यंत 'धर' लागत नाही. मोठ्या जमिनी, मुबलक पाणी आणि दुधाच्या व्यवसायामुळं गावात पहिल्यापासून सुबत्ता आहे. गावातल्या लोकांतही एकोपा आहे. सण, समारंभ, उत्सवाच्या वेळी सगळे लोक एकत्र येतात. दर एकादशीला रात्रभर हरिनामाचा जागर असतो. बारशीला पंगती होतात. वर्षातून दोनदा अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं जातं. *सामूहिक उपक्रमाला, सार्वजनिक कार्यक्रमाला दादा आवर्जून उपस्थित राहात, शक्य तेवढं योगदान देत. 'चांगल्या कामात आपण कधी आडवं पडू नये', यासाठी त्यांचा अट्टाहास असे.*

  *आमचं गाव छोटं असलं तरी गावातल्या लोकांनी आपल्या कर्तृत्वानं गावाचं नाव मोठं केलं.* एकनाथराव मेटे, लक्ष्मण कोळी यांचा स्वातंत्र्य चळवळीत आणि नंतर मराठवाडा मुक्ती संग्रामात सहभाग होता. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बलभीम परळकर, संभाजी शिंदे, भागवत दौंड, अंबऋषी मेटे, महादेव कोळी, अंकुश दौंड, अंगद शिंदे... या भूमीपुत्रांनी सैन्यात भरती होऊन देशसेवा केली. *कुठलाही राजकीय वारसा किंवा राजकारणाची पार्श्वभूमी नसताना मा विनायकराव मेटे स्वकर्तृत्वाने सलग चार वेळा विधान परिषदचे आमदार झाले. अरबी समुद्रात उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे ते काही काळ अध्यक्षही होते. आमच्या गावाच्या, जिल्ह्याच्या दृष्टीने ही अत्यंत बहुमानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे !*

  मुख्य रस्त्यापासून गाव थोडं बाजूला आहे, हे लक्षात घेऊन आ.विनायकराव मेटे यांनी गावात अनेक पायाभूत सुविधा निर्माण केल्या. आमदार निधीतून भव्य समाज मंदिर बांधून लोकांना निवारा उपलब्ध करुन दिला. वीज उपकेंद्राची निर्मिती करुन विजेचा लपंडाव थांबवला. दळणवळणाच्या सोई अपुऱ्या आहेत. लोकांना वेळेत आरोग्य सुविधा मिळत नाहीत, हे जाणून त्यांनी गावातच प्राथमिक आरोग्य केंद्र उभा केलं. माध्यमिक विद्यालय सुरू करुन गावातल्या दहावीपर्यंतच्या मुलामुलींची पायपीट थांबवली.

मात्र आम्ही शिकत होतो, त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. जिल्हा परिषदेची शाळाही सातवीपर्यंतच होती...

*क्रमशः..*

               *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*





Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य