दादा..! भाग - ५९

*दादा..!*

*भाग - ५९*

  माझ्याच वर्गात, पण 'ब' तुकडीत आजोळची, मामाच्या भावकीतली एक मुलगी होती. तिचं वडील, भाऊ आमच्या काकूला (माझ्या आईला) म्हणत, "आमची तायडी तुझ्या राजाला द्यायचीय, करणार का नाही?."
ते सहज म्हणत की खरंच.. माहीत नव्हतं !

काकूही हसत हसत त्यांना म्हणायची, "आत्ताच काय मला बांधून घेता? करायच्या टायमाला बघू की !"

*घरचे 'असं' म्हणतेत, ते तिलाही माहीत होतं आणि मलाही ! शाळा भरताना, सुटताना, जाता येता.. जेव्हा जेव्हा आमच्या भेटी व्हायच्या, तेव्हा तेव्हा ती बोलायचा प्रयत्न करायची...*
*मला मात्र अवघडल्यासारखं व्हायचं !*

९ वीची परीक्षा झाली, आम्हाला फक्त एक आठवडा उन्हाळ्याची सुट्टी होती. २ मे पासून आमचे १० वीचे तास सुरू होणार होते...

आम्ही गावाकडं आलो...
दोन वर्षांपूर्वीच दत्तूबप्पाचं लग्न झालेलं होतं, अधूनमधून त्यो दादाला म्हणायचा, "माझं मला वेगळं द्या !"

*दादा म्हणत, "आरं, अजून आम्ही भाऊ भाऊच वेगळं नाहीत, तुला कसं आणि कुणातून वेगळं द्यायचं?"*

आई आणि काकूलाही वेगळं राहावं वाटायचं. आपलं आपलं सवतं रवतं असावं वाटायचं...
पण *दादा आणि आबाचं ठरलेलं होतं.. काहीही झालं तरी वेगळं रहायचं नाही !*

*एक तर आर्थिक परिस्थिती नाजूक.. त्यात घरातलं वातावरण असं तापलेलं !*

  *अशा सगळ्या परिस्थितीत दादा नेटानं संसाराचा गाडा हाकत होते, जमेल तसा मार्ग काढत होते.. कारण दादा कारभारी होते. कारभारी म्हणजे कुटुंबातल्या सगळ्या माणसांच्या गरजा आणि अपेक्षांचा भार वाहणारा नोकरच की !*

  आबा म्हैस सांभाळत, दादा बैलांची कामं करत.
बैल बारदाना नसलेल्या शेतकऱ्यांना दुसऱ्याकडून शेतातली कामं करून घ्यावी लागायची. आमच्याकडं चांगली गावरान बैलजोडी होती.. 'हिऱ्या आणि हौश्या !' औत, तिफन, डुबं, कोळपं असा सगळा बारदाना होता. दादा घरच्या शेतातली कामं पटपट उरकत, मग दुसऱ्याच्या शेतात नांगरणी, पेरणी, रासणी, मोगडा पाळी करायला जात. बैलगाडीनं कडबा वाहणं, लाकडं वाहणं, शेतातला माल कळंबच्या आडतीला घेऊन जाणं, नांदूरच्या बाजारातून दुकानदाराची पेंड, किराणा माल आणणं अशी मिळतील ती गाडीभाड्याची कामंही करत. आम्हाला लाज वाटायची. कधी कधी मी दादाला म्हणायचो, "दादा, लोकांच्या शेतातली कामं नका करत जाऊ, आम्हाला लाज वाटते."

दादा म्हणत, "काम करण्यात कसली आलीय लाज ! त्यांचंही काम होतंय.. आपल्यालाही हातभार लागतोय."

*छातीचा कोट करून, परिस्थितीचे असे असंख्य घाव दादांनी झेलले.. पहाडासारखे सर्वांच्या पुढे उभे राहिले.. परंतु आबा, आई आणि काकूला मात्र कधीच दुसऱ्याच्या शेतात कामाला जाऊ दिलं नाही !*

*क्रमशः..*

               *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*



  

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य