दादा..! भाग -७९

*दादा..!*

*भाग - ७९*

  *माझे डोळे पिवळे झाले होते, नखं पिवळी दिसत होती. लघवी पिवळी होत होती. तोंडाला चव नव्हती, खाऊ पिऊ वाटत नव्हतं. पोटात दुखत होतं, मुटकुळं करून झोपलं तरंच बरं वाटत होतं...*
नांदूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सगळ्या तपासण्या केल्या. *पिवळी कावीळ झाल्याचं निष्पन्न झालं.* डॉक्टरांनी दोन सलाईन लावल्या आणि पाच दिवसांच्या गोळ्या औषधी दिल्या.

  तीन दिवस गोळ्या औषधं घेतली, पथ्यं पाणी पाळलं पण म्हणावा तसा फरक वाटत नव्हता. *लोक म्हणत, "काविळीला दवाखान्याचा फरक पडत नाही. खाजगी उपाय करायला पाहिजे."*

दादांना कुणीतरी सांगितलं, "नेवासा तालुक्यात भेंडा नावाचं गाव आहे. तिथं एक डॉक्टर काविळीवर औषध देतात. भेंडा फॅक्टरी म्हणलं की कुणीही सांगतं, राजूला तिथं घेऊन जा."

कुठं राजेगाव आणि कुठं भेंडा फॅक्टरी ! जवळपास दोनशे किलोमीटरचं अंतर. एस टी चा प्रवास त्यात पावसाळ्याचे दिवस ! सकाळी उन्हाचे चटके, दुपारी प्रचंड उकाडा आणि सायंकाळी पावसाच्या सरी, असं सगळं वातावरण ! पण, *मन कणखर असलं की अडथळ्यांची भीती वाटत नाही !*
दादा म्हणाले, "शिरूरहून अडीचच्या गाडीनं बीडला जाऊ आणि तिथून रात्रीचं शेवगावला."

काकू म्हणाली, "मी येऊ का सोबत?"

दादांनी नकारार्थी मान हलवली.
'तिच्याही' जीवाची घालमेल चालू होती. तीनदा बाहेरून घरात, घरातून बाहेर जात येत होती, काही न बोलताही बरंच काही बोलत होती !

  अडीचच्या गाडीनं बीडला पोचायला आम्हाला झाकड पडली. काळेकुट्ट ढगांनी आभाळ झाकोळून गेलं होतं. सगळीकडं अंधार पसरला होता. त्या रात्रीच्या अंधारात कितीतरी वेळ शेवगावच्या दिशेनं धावणारी गाडी पहाटं पहाटं शेवगावच्या स्टँडला गेली. तिथून अर्ध्या पाऊण तासाच्या अंतरावर भेंडा फॅक्टरी होती, पण वाहन नव्हतं. दोन तास थांबावं लागणार होतं. आमच्यासारखे अजून वीस पंचवीस प्रवासी सकाळ होण्याची वाट पाहात होते. त्यातील अर्धेअधिक प्रवासी भेंड्याला जाणारे होते.
*प्रवासानं दगदग झाली होती, गाडीच्या आदळ्यानं अंग ठेचून निघालं होतं. रात्रभर डोळ्याला डोळा नव्हता. उभं राहण्याचंही अंगात अवसान उरलं नव्हतं. मी एक कोपरा गाठला आणि अंगाला चादर लपेटून अंग भुईला टाकलं. दादा म्हणाले, "मी बसतो, तू झोप तास दोन तास."*

  सहाची शेवगाव - नेवासा शटल फलाटाला लागली, तसं लोकांत चैतन्य पसरलं. तासाभराची झोप झाल्यानं मलाही बरं वाटत होतं. स्टँडसमोरच्या छोट्या छोट्या हॉटेलवाल्यांनी मोठ्या मोठ्या पातेल्यात पाणी तापायला ठेवलं होतं. बाजूला काळ्या मंजनाची छोटी बाटली होती. दात घासून आम्ही चहा घेतला. गरम गरम चहाच्या घोटानं प्रवासाचा शीण अजून थोडा हलका झाला !

एका बाजूला उंच उंच झाडीत लपलेला 'ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना' दुसऱ्या बाजूला भेंडा हे छोटंसं गाव आणि मधून नेवाशाकडं जाणारा रस्ता ! स्टॉपवर उतरताच डॉ. वाबळे यांचं 'कावीळ उपचार केंद्र, भेंडा' असा बोर्ड दिसला. *दवाखाना छोटा होता, पण काविळीवर उपचार घ्यायला आलेल्या रुग्णांची रांग मोठी होती. दवाखान्यात काम करणारे सेवक लोकांना, "नाष्टा करा, चहापाणी प्या, रुमाल घेऊन बसा," अशा सूचना देत होते. "औषध घेतल्यानंतर थोड्या वेळाने सर्दी होईल, घसा दुखेल.. पण घाबरू नका, चहा घ्या. तेलकट, तिखट, आंबट अवश्य खा !" असं सांगायलाही ते विसरत नव्हते.*

सगळे रुग्ण पांढरे रुमाल घेऊन बसले होते. आठच्या सुमारास डॉक्टर आले, तोपर्यंत सेवकांनी सगळी तयारी करून ठेवली होती. *डॉक्टर रुग्णाला उतानं झोपवायचे आणि त्याच्या नाकात २-२ थेंब औषध सोडायचे. औषध नाकातून घशात उतरायचं. नाकाला रुमाल लावून पेशंट ठसकतच उठायचा. थोड्या वेळात नाकातून पिवळं पाणी यायला सुरुवात व्हायची...*

*नाकातून आलेल्या पिवळ्या पाण्यानं दिवसभरात माझे तीन रुमाल भिजले !*
*खरंच, डॉ वाबळे यांची कावीळ रुग्णांची सेवा अलौकिक आहे ! सलाम !!!*

*क्रमशः...*

               *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*




Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य